मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क; अकोल्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
अकोला – मंगळवारी सायंकाळी शहरावर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे अकोल्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याचे, नाले तुडुंब वाहण्याचे आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले. काही भागांत वीज खंडित झाली असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रशासनाने तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शहरातील रामदासपेठ, जुना शहर, भोसलेनगर, शिवाजी नगर, मनपा परिसर, जठार पेठ आणि मोतीलाल लेआऊटसारख्या भागांमध्ये झाडे रस्त्यावर कोसळली, ज्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. याशिवाय काही झोपडपट्ट्यांमध्ये घरे पाण्यात गेल्याचे प्रकारही निदर्शनास आले. शहरातील काही नाले आणि गटारी भरून वाहू लागल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आले आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला आहे. संबंधित झोन कार्यालयांचे कर्मचारी, अग्निशमन दल, आणि स्वच्छता कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. झाडे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यात आली आहे.
नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनपाचा टोल-फ्री क्रमांक १८००-२३३-५७३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सर्पदंशाच्या घटना वाढू शकतात, यासाठी सर्पमित्र बाळ काळणे (९८३४८९६२१५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, अकोल्यात आणखी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सखल भागांत राहणं टाळावं, सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं आणि गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
सतर्कता आणि सहकार्य हाच उपाय असून, नागरिकांनी अफवांपासून दूर राहावे व अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.